संगणक क्षेत्रात काम करणे हे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते; पण ही प्रतिष्ठा, मानसन्मान खऱ्या अर्थाने अनुभवायचे असतील, तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थित असायला हवे. संगणकामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व स्वतःची प्रकृती एकदा नीट समजून घेतली आणि त्यानुसार जीवनशैली आखली, साध्या पण प्रभावी उपायांची योजना केली, तर आरोग्य तर टिकेलच आणि व्यवसायातील कार्यक्षमताही वृद्धिंगत होईल.
जीवनशैलीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्यवसाय. काळानुसार व्यवसायाचे स्वरूप बदलत जाणे स्वाभाविक असले, तरी व्यवसायामुळे आरोग्यावर काही दुष्परिणाम तर होत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवायला हवे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यवसायानुरूप आवश्यक ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आरोग्य टिकेलच, शिवाय व्यवसायातील गुणवत्ताही उत्तम राखता येईल.
आयुर्वेद हे जीवनशास्त्र असल्याने त्याला काळाचे वा देशाचे बंधन नाही. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदशास्त्र पृथ्वीतलावर आले, संहितांच्या रूपात लिहिले गेले. तेव्हा जरी सद्यःस्थितीतील संगणक अस्तित्वात नसला, तरी संगणकामुळे सध्याच्या जीवनावर होणारे परिणाम लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ते मार्गदर्शन आयुर्वेद करू शकते.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर संगणकाला पर्याय नाहीच; पण सध्या सर्वच क्षेत्रांत संगणकाचा प्रसार मोठ्या वेगाने होत आहे. चोवीस तासांतले १०-१२ तास सातत्याने संगणकाचा वापर करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. आधुनिक जीवनशैलीतला अविभाज्य भाग म्हणून आपणा सर्वांनी संगणक स्वीकारला आहे; पण संगणक वापरताना सर्वांनीच, विशेषतः संगणकावर तासन् तास काम करणाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडी काळजी घ्यायला हवी.
संगणकावर बसून काम करावे लागते, शिवाय हाताने की बोर्ड, माऊस यांचा सातत्याने वापर करावा लागतो. संगणकाच्या पडद्याकडे सातत्याने बघावे लागत असल्याने डोळ्यांवर ताण येत असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संगणकाने दिलेली माहिती साठवण्याची वा आपल्या कल्पना संगणकावर साकार करण्याची मोठी जबाबदारी मेंदूवर असते.
संगणकावर काम करताना बसण्याची स्थिती व्यवस्थित असण्याकडे लक्ष द्यायला हवे. खुर्चीला टेकून बसले, तरी पाठीचा कणा ताठ असण्याकडे लक्ष ठेवायला हवे. खुर्चीची उंची इतकी असावी, की बसल्यावर दोन्ही पाय जमिनीवर व्यवस्थित टेकू शकतील. "की बोर्ड' अशा उंचीवर असावा, की "की बोर्ड' व "माऊस' वापरताना हात कोपरातून जवळजवळ काटकोनात वाकलेले असतील आणि खांद्यांवर अतिरिक्त ताण येणार नाही.
मान, पाठ, खांद्यांची काळजी
ही सगळी काळजी घेतली, तरीही संगणकावर सलगपणे फार वेळ काम केले, की त्याचा मान, पाठ, खांदे, मान व खांद्यांच्या मधला मांसल भाग यावर ताण येणे स्वाभाविक असते. या ताणातून काही समस्या निर्माण होणार नाहीत या दृष्टीने आयुर्वेदीय दृष्टिकोनातून पुढील उपाय सुचवता येतील.
परात्री झोपण्यापूर्वी मान व पाठीला हलक्या हाताने "कुंडलिनी तेला'सारख्या नसांची, मांसपेशींची आणि हाडांची ताकद वाढविणारे व त्या ठिकाणची लवचिकता टिकविणारे तेल लावणे. एकंदर मान व पाठीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, मान व पाठीतील नसांचे पुनर्जीवन होऊन त्यांची कार्यक्षमता वाढावी, कंबरदुखी, मानदुखी वगैरे त्रास होऊ नयेत म्हणून किंवा होत असल्यास बरे व्हावेत म्हणून अधूनमधून तज्ज्ञ आयुर्वेदिक थेरपिस्टकडून "कुंडलिनी मसाज' घेण्याचाही उत्तम फायदा होताना दिसतो.
पसंगणकावर काम करत असताना दर अर्ध्या-एक तासाने एक-दोन वेळा हाताची मूठ वळवून बोटांना ताण येईल अशा पद्धतीने बोटे फाकवून पंजा उघडणे. यामुळे मनगट व हातांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते.
परोज सकाळी पाठ व मानेला हितकर ठरतील अशी ताडासन, मार्जारासन, भुजंगासन आणि संतुलन क्रियायोगातील "समर्पण', "शाबास' वगैरे क्रिया यांचा अभ्यास करणे.
पस्कंधचक्र म्हणजे दोन्ही हातांची बोटे खांद्यावर टेकवून खांदे वर्तुळाकार उलट, सुलट दिशेने फिरविण्याने खांद्यांवरचा ताण नाहीसा व्हायला मदत होते.
डोळ्यांची काळजी
संगणकावर काम करणाऱ्यांना डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक असते. डोळ्यांपासून संगणकाचा पडदा किमान दीड फुटावर असावा, असे सांगितले जाते; तसेच पडद्यावरून खोलीतल्या दिव्याचा वा ट्यूबलाइटचा प्रकाश डोळ्यांवर उलटा परावर्तित होत नाही आणि डोळ्यांवर समोरून दिव्याचा प्रकाश येत नाही याकडे लक्ष ठेवावे, पडद्याची प्रखरता डोळ्यांना सहन होईल अशा प्रमाणात असू द्यावी, गरज असल्यास अँटी ग्लेअर स्क्रीन वापरावा, अशा सूचना दिल्या जातात.
ही सगळी काळजी घेतली, तरीही डोळे थकणे, लाल होणे, चुरचुरणे, डोळे कोरडे पडणे, एवढेच नाही, तर डोळ्यांचा नसा कमकुवत होणे, डोळ्यांमधला दाब वाढणे, नजरेत दोष उत्पन्न होणे, असे त्रास होताना दिसतात. हे टाळण्याच्या दृष्टीने सुरवातीपासूनच खालीलप्रमाणे उपाय योजता येतात.
पप्रखर प्रकाश व पडद्यावरून उत्सर्जित होणारा किरणोत्सर्ग यामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी डोळ्यांत आयुर्वेदिक अंजन घालणे उत्तम असते. मोत्याचे भस्म, त्रिफळा, तूप वगैरे डोळ्यांसाठी उपयुक्त आणि थंड द्रव्यांपासून तयार केलेले "सॅन अंजन'सारखे अंजन डोळ्यांत घालता येते. हलका रंग हवा असल्यास "ग्रे' किंवा अंजन घातलेले अजिबात समजू नये, असे वाटत असल्यास "क्लिअर' म्हणजे रंगहीन अंजन वापरता येते. १०-१२ तास संगणकावर काम करावे लागणाऱ्यांनी हे दिवसातून एक-दोन वेळा डोळ्यांत घालण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो.
पसंगणकावर काम करताना बहुतेक वेळा पापण्यांची उघडझाप करणे विसरून जायला होते. डोळ्यांमधला ओलावा कायम राहण्याच्या दृष्टीने लक्षात ठेवून पापण्यांची उघडझाप करायला हवी. याशिवाय दर तासाने मोजून २० वेळा पापण्या उघड-बंद करणे चांगले.
पदर दोन तासांनी संगणकाच्या पडद्यावरून नजर हटवणे, काही तरी वेगळे काम करणे किंवा शक्य असल्यास दोन मिनिटांसाठी डोळे बंद करून बसणे चांगले होय. लांबवर, शक्य असल्यास झाडे वगैरे हिरवाईवर नजर टाकणेही उत्तम असते.
पसलगपणे संगणकावर काम करणाऱ्यांनी दिवसातून २-३ वेळा बंद डोळ्यांवर थंड (सामान्य तापमानाच्या) पाण्याचे ५-६ हबके मारण्यानेही डोळे लाल होणे, थकणे वगैरे त्रास कमी होऊ शकतात. त्रिफळ्याच्या काढ्याने डोळे धुणे, हिरवळीवर चालणे हेही डोळ्यांसाठी चांगले असते.
पआठवड्यातून २-३ वेळा तरी ५-१० मिनिटांसाठी शुद्ध गुलाबपाण्याच्या किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.
परात्री झोपण्यापूर्वी नाकात "नस्यसॅन घृता'सारखे सिद्ध घृत किंवा घरच्या साध्या साजूक तुपाचे २-३ थेंब टाकणे, डोळ्यांमध्ये "सुनयन तेला'सारख्या डोळ्यांची ताकद वाढविणाऱ्या द्रव्यांनी सिद्ध तेल टाकणे हे सुद्धा डोळ्यांसाठी उपयुक्त ठरताना दिसते.
पसुनयन घृतासारखे दृष्टीला हितकर द्रव्यांनी सिद्ध औषधी तूप खाणे हाही उपाय डोळ्यांचे आरोग्य टिकावे म्हणून उपयुक्त असतो.
पनेत्रबस्ती हा आयुर्वेदिक उपचारही संगणकीय व्यवसायातील व्यक्तींनी आवर्जून करून घ्यावा असा आहे.
उष्णता कमी करण्यासाठी
संगणकावर काम करताना पाठ-मान-डोळे यांच्यावर येणारा ताण सहज लक्षात येऊ शकतो; पण सर्वांत महत्त्वाची व पटकन लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे संगणकामुळे शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढते. शरीरात वाढणारी उष्णता ही डोकेदुखी, अशांत झोप, चक्कर, ऍसिडिटी, केस गळणे, केस अकाली पांढरे होणे अशा त्रासांचे मूळ कारण असते. संगणक वापरणाऱ्या सर्वांनीच या वाढणाऱ्या उष्णतेला वेळेवर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी खालील उपाय करता येतात.
--दही, लस्सी, अननस, चिंच, ढोबळी मिरची, मद्य, आंबवलेले पदार्थ असे पित्त वाढविणारे पदार्थ अति प्रमाणात घेण्याचे टाळणे.
--रात्रीची जागरणे टाळणे, पुरेशी झोप (किमान ६-७ तास) मिळण्याकडे लक्ष ठेवणे.
--१५ दिवसांतून एकदा रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेल घेऊन पोट साफ करावे.
संगणक व्यवसायातील वाढती स्पर्धा, कामातला ताण आणि कायमच सिद्ध करावी लागणारी कार्यप्रवणता यामुळे मन व मेंदूवर खूप ताण असतो. परिपूर्ण आरोग्यासाठी या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे.
मानसिक शांततेसाठी
अधूनमधून योगनिद्रा करणे, प्रवास वगैरे करताना मन शांत करणारे संगीत ऐकणे, सकाळी वा संध्याकाळी ॐकार म्हणणे, दीर्घ श्वसन करणे वगैरेंमुळे मन शांत होऊन एकाग्रता वाढताना दिसते.
सध्या संगणक क्षेत्रात काम करणे हे सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते; पण ही प्रतिष्ठा, मानसन्मान खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल, तर त्यासाठी आरोग्य व्यवस्थित असायला हवे. संगणकामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व स्वतःची प्रकृती एकदा नीट समजून घेतली आणि त्यानुसार जीवनशैली आखली, अंजन, पादाभ्यंगासारख्या साध्या पण प्रभावी उपायांची योजना केली, तर आरोग्य तर टिकेलच आणि व्यवसायातील कार्यक्षमताही वृद्धिंगत होईल.
डॉ. श्री. बालाजी तांबे
Sunday, October 25, 2009
संगणक व्यवसाय व आरोग्य
Posted by
kedar143
at
12:35 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment